पुणे: शिक्षणाचे माहेरघर, माहिती-तंत्रज्ञानाचे हब असलेल्या पुण्याची ओळख आता वाढत्या हिंसक गुन्ह्यांमुळेही चर्चेत येऊ लागली आहे. शहरात घडलेल्या खुनांच्या घटनांचा मागोवा घेतला असता, गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत असल्याचे स्पष्ट होते. क्षुल्लक कारणावरून होणारे खून, प्रेमसंबंधातील हत्या, आर्थिक व्यवहारातील वाद, टोळीयुद्ध, कौटुंबिक कलह, व्यसनाधीनता अन् वर्चस्वाच्या संघर्षातून रक्तरंजित घटना घडत आहेत. विशेष म्हणजे बहुतांश आरोपी १५ ते ४५ वयोगटांतील असल्याने ही बाब अधिक चिंताजनक ठरत आहे.
शहरात चालू वर्षातील १ जानेवारी ते २७ जुलैअखेर या सात महिन्यांत ५० जणांचे खून झाले आहेत. तर, ८० जणांच्या खुनाचा प्रयत्न झाला आहे. तसेच, दुखापतीचे तब्बल ८१४ गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी शहरात ८४ खून, तर १६६ जणांवर खुनी हल्ले झाले होते. दुखापतींच्या गुन्ह्यांचा आकडा १५५१ च्या घरात आहे. २०२४ मध्ये खुनाच्या घटना ९४ घडल्या होत्या. १८५ जणांवर प्राणघातक हल्ले झाले असून, गंभीर दुखापतीचे १,५५२ गुन्हे घडले आहेत.
परिमंडळ दोनमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, भारती विद्यापीठ आणि आंबेगाव या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २७ जुलै २०२६ अखेर १३ खुनांच्या घटना घडल्या असून, २१ जणांवर खुनी हल्ले झाले आहेत. या पोलिस ठाण्यांचा परिमंडळ दोनमध्ये समावेश होतो. यातील भारती विद्यापीठ आणि आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बहुतांश उपनगरांचा भाग येतो. शहरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार या उपनगरांच्या परिसरात वास्तव्यास असल्याचे दिसून येते.
खुनांमागील प्रमुख कारणे
प्रेमसंबंध, एकतर्फी प्रेम आणि विवाहबाह्य संबंध. आर्थिक व्यवहार, भागीदारी, जमीन व कर्जाचे वाद. टोळीयुद्ध, वर्चस्व आणि सराईत गुन्हेगारांतील संघर्ष. कौटुंबिक कलह व मालमत्तेचे वाद. दारू व अमली पदार्थाची नशा क्षुल्लक कारणांवरून टोकाची प्रतिक्रिया. बदलते गुन्हेगारीचे स्वरूप कोयता, पिस्तुलांचा वाढता वापर. सोशल मीडियावरून धमक्या व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न.