पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी करून विक्री करणार्या तिघांना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, कोंढवा, राजगड, वानवडी, सासवडसह इतर जिल्ह्यांतील 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. निखिल सुनील राक्षे ( 25, रा. मार्केट यार्ड), सागर शिवाजी गुंजले (21, रा. माण, सातारा), गणेश भरत मोहिते (28, रा. माण, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वाढत्या वाहनचोरीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान राक्षे याच्याकडे चोरीची दुचाकी असून, तिला नंबरप्लेट नाही. तसेच ही दुचाकी विकण्यासाठी तो बोपदेव घाट परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार विकास मरगळे, राहुल थोरात, जयदेव भोसले यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून बोपदेव घाट परिसरातून राक्षेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
राक्षे याच्याकडे आणखी दुचाकी असून, तो विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचे समजले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सागर गुंजले, गणेश मोहिते यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तब्बल 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संदीप भोसले, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, सुहास मोरे, अभिजित रत्नपारखी, शशांक खाडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा