पुणे: उन्हाळ्यात पुणेकरांची पसंती असलेल्या आंबट-गोड चेरीच्या दरात यंदा मोठी वाढ झाली असून, हंगामाच्या सुरुवातीलाच चेरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे. हिमाचल प्रदेशातील उत्पादन घट, पर्यटकांकडून वाढलेली मागणी आणि विमान इंधनाच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने चेरीच्या भावात किलोमागे तब्बल 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे.
परिणामी, मागील वर्षी 300 ते 350 रुपयांना मिळणारी चेरी यंदा घाऊक बाजारातच 400 ते 450 रुपयांवर पोहोचली असून, किरकोळ बाजारात तिचे दर 600 रुपयांच्या पुढे गेले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात सध्या काश्मीर येथून दररोज सुमारे दीड हजार बॉक्स चेरीची आवक होत आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेशातील चेरी बाजारात दाखल होते, त्यानंतर काश्मीरच्या चेरीचा हंगाम सुरू होतो. मात्र, यंदा बदलत्या आणि लहरी हवामानाचा फटका हिमाचलमधील चेरी उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून, उपलब्ध मालालाही स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली आहे. यावर्षी हिमाचल प्रदेशात पर्यटन हंगाम तेजीत असल्याने पर्यटकांकडून चेरीला मोठी मागणी वाढली आहे.
स्थानिक बाजारातच चेरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा माल बाहेरील बाजारपेठेत पाठविण्यापेक्षा स्थानिक विक्रीकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हिमाचल प्रदेशातून पुण्याकडे होणारी चेरीची आवक जवळपास ठप्प झाली आहे. दरम्यान, सध्या पुण्यात उपलब्ध असलेली बहुतांश चेरी काश्मीरमधून येत आहे. काश्मीरहून विमानमार्गे माल पाठविला जात असल्याने विमान इंधनाच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर झाला आहे. त्यामुळे काश्मीरची चेरीही महागल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
यंदा चेरीच्या उत्पादनावर हवामानाचा मोठा परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेशातून आवक जवळपास बंदच असल्याने बाजार पूर्णपणे काश्मीरच्या चेरीवर अवलंबून आहे. त्यातच विमान वाहतूक खर्च वाढल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ग््रााहकांकडून मागणी चांगली असली, तरी वाढलेल्या दरामुळे खरेदीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. पुढील काही दिवसांत काश्मीरमधील आवक वाढली, तर दरात थोडी नरमाई येण्याची शक्यता आहे.सत्यजित झेंडे, व्यापारी, मार्केट यार्ड.