पुणे: व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला.
परीक्षा व्यवस्थेची कामे 2021 ते 2025 या कालावधीत एका उद्योगसमूहाशी संबंधित विविध कंपन्यांनाच देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. निविदा प्रक्रियेत स्पर्धा टाळण्यासाठी निकषच संबंधित समूहाच्या सोयीने ठरवण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. या माध्यमातून सुमारे 699 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे शुल्कात वाढ होऊन त्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याबाबत 2023 मध्येच तक्रारी दाखल करूनही शासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असे त्यांनी नमूद केले. उलट तक्रारदाराचीच चौकशी झाल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, परीक्षा वेळेत न झाल्याने प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत असून, काही खासगी विद्यापीठांना त्याचा फायदा होत असल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आस्थापनांवर फौजदारी कारवाई करावी, त्यांना काळ्या यादीत टाकावे आणि परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी शासकीय यंत्रणेकडेच द्यावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.