Blood Pudhari
पुणे

Pune Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा; दररोज १,५०० पिशव्यांची गरज, संकलन मात्र ७००-८००

डेंग्यूमुळे प्लेटलेट्सची मागणी वाढली; थॅलेसेमिया रुग्णांमुळे रक्तपेढ्यांवरील ताण वाढला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून शहरांतील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा निम्म्याने घटला आहे. याचा परिणाम वाढत्या डेंग्यूच्या रुग्णांवर होत असल्याची समोर आले आहे. विशेषतः थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित रक्तसंक्रमणाची गरज असल्याने रक्तपेढ्यांवरील ताण वाढल्याने नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. शहरातील ७८० रुग्णालयांना दिवसभराला १५०० रक्ताच्या पिशव्या लागतात, मात्र प्रत्यक्षात प्रतिदिवस ७०० पिशव्यांचे रक्तसंकलन होत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता सप्टेंबर महिन्यातच रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ऊन-पावसाचा लपंडाव आणि बदलत्या हवामानामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना रक्तातील प्लेटलेट्स आवश्यक असून, रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणी वाढत आहेत. अनेक रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांची चिंता वाढत चालली आहे.

डेंग्यूच्या रुग्णांमुळे प्लेटलेट्सची मागणी वाढत आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये संपूर्ण रक्तासोबतच विविध रक्तघटकांचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे. 'रक्तपेढीतील प्लेटलेट्सची मागणी वाढत असतानाच थॅलेसेमियासारख्या आजारांच्या रुग्णांना नियमित अंतराने रक्ताची गरज असते. अशा स्थितीत रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्यास रक्तपेढ्यांवरील ताण आणखी वाढू शकतो, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ट्रान्सफ्युजन मेडिसिन विभागाच्या डॉ. ब्रिंदा कक्कर यांनी दिली.

'गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत असून, सध्या सर्वाधिक कमतरता प्लेटलेट्सची आहे. रक्तपेढीत उपलब्ध असलेल्या चार प्लेटलेट्स एका रुग्णासाठी राखीव आहेत. त्यामुळे सध्या एकही प्लेटलेट उपलब्ध नाही. पावसामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली, तसेच झालेल्या शिबिरांमध्येही अपेक्षित रक्तसंकलन झालेले नाही, परिणामी तुटवडा निर्माण झाला आहे,' असे केईएम हॉस्पिटलमधील रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर यांनी सांगितले.

कालमापकतेची समस्या

प्लेटलेट्स हा रक्तामधील प्रमुख घटक आहे. डेंग्यूसारख्या आजारांत प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास गरजेनुसार प्लेटलेट्स दिल्या जातात. रक्तदानातून मिळालेल्या रक्तापासून प्लेटलेट्स वेगळ्या केल्या जातात. त्यांचा साठा साधारण पाच दिवसच करता येतो. त्यामुळे जास्त प्रमाणात साठा करून ठेवता येत नसल्याची समस्याही रक्तपेढीतील प्रमुखांनी सांगितली.

शहरातील स्थिती

  • रुग्णालये (सर्व प्रकारचे) : ७८०

  • रक्तपेढ्या : ३५

  • दररोज गरज : १,५०० रक्तपिशव्या

  • प्रत्यक्ष संकलन : ७००-८०० पिशव्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT