पुणे: विविध आजार आणि त्यातील उपचारात रुग्णांना रक्ताची वाढती गरज, यामुळे रक्तदानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मात्र, त्यातुलनेत रक्तदात्यांची उपलब्धता आणि रक्तदानाचे प्रमाण खूप कमी आहे. परिणामी, दिवसाकाठी सुमारे दीड हजार रक्तपिशव्यांची गरज असलेल्या पुण्यात निम्म्याहून कमी रक्तसंकलन होत असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय रुग्णालय असलेल्या ससून, वायसीएम तसेच दीनानाथ आणि कमांड हॉस्पिटलच्या अंगणात दररोज शेकडो रुग्ण जिवाची बाजी लावून रक्तदात्यांची वाट पाहत असतात. साहजिकच, रक्तदान शिबिरे वाढवण्याची आणि त्यातून रक्तसंकलन वाढवण्याची गरज वाढत चालली आहे.
या उपाययोजना आवश्यक
रक्तपेढ्यांनी नफ्याच्या गणितापेक्षा 'नाते' जपावे, हेच हिताचे ठरणार आहे.
'मेगा कॅम्प्स'बरोबरच लहान-लहान शिबिरे आयोजित करण्याची गरज.
रक्तदानासाठी धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यायला हवा.
नियमबाह्य रक्तसंकलनावर शासनाचा अंकुश आवश्यक आहे.
रक्तदानाला प्रोत्साहन देण्याबरोबरच रक्तदानाबाबतचे गैरसमज, भीतीही दूर करायला हवी.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि वाढत्या आजारपणामुळे रक्ताची मागणी मोठी आहे. वायसीएम आणि ससूनसारख्या सरकारी रुग्णालयांतही रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान मिळत असते. त्यामुळे पुण्यात रक्ताचा अद्यापही तुटवडा असून, रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे. त्याचबरोबर रक्तदानाचा गौरव हाच समाजसेवेचा खरा सन्मान आहे.राम बांगड, अध्यक्ष, रक्ताचे नाते ट्रस्ट