पुणे: दहीहंडी आणि गणेशोत्सवात डीजे तसेच मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमच्या वापरावरून पुण्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील २०० हून अधिक गणेश मंडळांनी डीजे-मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना बालन यांनी सांगितले की, पुण्याच्या गणेशोत्सवाची पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख जपणे तसेच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
“गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अनेक गणेश मंडळांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील २०० हून अधिक मंडळे या उपक्रमात सहभागी झाली आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवावे आणि उत्सवामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, ही आमची भूमिका आहे,” असे बालन यांनी सांगितले.
बालन यांनी गेल्या वर्षीही डीजेमुक्त गणेशोत्सवाची भूमिका घेतली होती. २०२५ मध्ये डीजे किंवा अनूचित गाण्यांचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांना बालन ग्रुपकडून जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर हा उपक्रम दहीहंडी उत्सवातही राबवला. सहभागी गणेश मंडळांसोबत आयोजित कार्यक्रमात डीजे ऐवजी पारंपरिक ढोल-ताशा, बँड आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले.
'त्या' साऊंड सिस्टीमना परवानगी नाही
दहीहंडी आणि गणेशोत्सवात डीजे व ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत पुण्यात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही गणेश मंडळे आणि उत्सवाशी संबंधित घटक निर्बंध शिथील करण्याची मागणी करत असताना, पुणे पोलिसांनी निर्धारित ध्वनिमर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या साउंड सिस्टिमना परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.