पुणे: खड्डेविरहित उत्सव मंडप उभारणे, पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढणे अन् मिरवणुकीत गुलालाची उधळण न करणे... अशा कार्यातून सहकारनगरमधील संजीवनी मित्रमंडळाने एक आदर्श निर्माण केला असून, मिरवणुकीदरम्यान नागरिकांना तुळशीचे रोप वाटण्याचा अनोखा उपक्रमही मंडळाकडून राबविला जात आहे.
इतकेच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून डीजे न वाजवता मंडळाचे कार्यकर्ते विसर्जन मिरवणूक काढत आहेत आणि त्यांच्या या पावलावर अनेक मंडळांनीही डीजेमुक्त मिरवणूक काढण्यास सुरुवात केली आहे. Ganesh Chaturthi
मंडळाकडून उत्सवात सामाजिक विषयांवरील देखाव्यातून समाजप्रबोधन करण्यात येत असून, मंडळाने आपल्या वेगळ्या उपक्रमांमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सहकारनगर क्रमांक 1 येथे असलेल्या संजीवनी मित्रमंडळाचे यंदाचे 56 वे वर्ष आहे. खड्डेविरहीत मंडपाची संकल्पना गेल्या 25 वर्षांपासून मंडळाकडून राबविली जात आहे. तर गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनेच ढोल-ताशांच्या गजरात श्रीगणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढण्यात येत आहे. (Latest Pune News)
याशिवाय विसर्जन मिरवणूकही डीजे न वाजता पारंपरिक पद्धतीने काढण्यात येत आहे. मंडळाने गणेशोत्सवामध्ये सादर केलेले देखावे आणि वर्षभरातील उपक्रमांची दखल घेत विघ्नहर्ता पुरस्कारासोबतच विविध पुरस्कार मंडळाला मिळाले आहेत.
मंडळाकडून राबविण्यात येणारे उपक्रम
विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान, दिव्यांग मुलांना वस्तूंचे वाटप
सफाई,विद्युत आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा सन्मान
गणेशोत्सवात पोलिसांसाठी जेवणाची व्यवस्था
विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन
आदिवासींसोबत दिवाळी साजरी करणे
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व.
उत्सवाच्या नियोजनात पुरुष कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्याही उत्साहाने सहभागी होतात. उत्सवातील एका दिवसाचे संपूर्ण नियोजन त्या करतात. या उपक्रमाला आम्ही एक दिवस नारीशक्तीचा असे नाव दिले आहे. महिलांसाठीच्या विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे नियोजन महिला कार्यकर्त्या करतात. तसेच, उत्सवात स्पर्धा आणि खेळ आयोजित करण्याची जबाबदारी युवा वर्गाकडे असते. प्रत्येकाचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो.त्यामुळे सगळेजण मिळून गणेशोत्सव उत्साहात साजरा करतो.- संजय विद्वांस, अध्यक्ष, संजीवनी मित्रमंडळ