पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील दोघा मृतांना न्याय मिळेल तो केवळ सामान्य लोकांच्या दबावामुळेच, हे विसरता येणार नाही, अशी पाेस्ट आमदार रोहित पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत व्यवस्थेवर निशाणा साधला आहे. Pune Porsche Car Accident
रोहीत पवार यांनी आपल्या 'X' अकाउंटवर पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी पोस्ट कर व्यवस्थेवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कल्याणीनगरमध्ये दोन निष्पापांना गाडीखाली चिरडल्यानंतर किडलेल्या संपूर्ण यंत्रणेचंच पितळ उघड पडलं. पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे कारनामे उघडकीस आले, डॉक्टरांनी हात धुवून घेतले, RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसलं. बाल न्याय मंडळानेही 'निबंध' लिहायला सांगून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला एका दिवसात मोकळं सोडलं. एरवी रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडूनही दंड वसूल करणाऱ्या महापालिकेलाही मग जाग आली आणि त्यांनी घाऊक स्वरुपात हॉटेलांवर कारवाई करुन हातावर पोट असलेल्या अनेक सामान्य कामगारांच्या नोकऱ्यांचा घोट घेतला. Pune Porsche Car Accident
हे संपूर्ण व्यवस्था सडल्याचंच लक्षण आहे. इतरही सगळ्या विभागात हेच सुरु असून सामान्य लोकांसाठी काम करणं अपेक्षित असलेली ही व्यवस्था सरकार कुणाचंही असलं तरी केवळ पॉवरफुल लोकांना पायघड्या घालून त्यांच्यासाठीच काम करताना दिसते. म्हणून सामान्य लोकांनाच दबाव आणून या किडलेल्या व्यवस्थेवरच बायपास सर्जरी करावी लागणार आहे. नाहीतरी आज त्या दोन मृतांना न्याय मिळण्याची जी काही शक्यता निर्माण झालीय तीही केवळ सामान्य लोकांच्या दबावामुळेच, हे विसरता येणार नाही.
गेले काही दिवस पुण्यातील कल्याणनगर येथील अपघात प्रकरण गाजत आहे. मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श कारने चालवत रविवारी (दि.१९) पुण्यातील दाेन आयटी इंजिनिअरला चिरडले. अश्विनी कोस्टा व अनिस अवधिया अशी मृतांची नावे आहेत. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहे. तर अनिसची आई-वडील वृद्ध असून, अनिस हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. दोघांनीही त्यांचे कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले होते.
हेही वाचा