पुणे : राज्यातील डाळिंबाचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. सद्यःस्थितीत बाजारात दाखल होत असलेल्या डाळिंबाच्या प्रतवारीतही घसरण झाली आहे. मात्र, मागणी चांगली असल्याने डाळिंबाचे गत आठवड्यातील दर टिकून आहेत. राज्यातील हंगाम आटोपल्यानंतर कर्नाटक, गुजरात येथून डाळिंबाची आवक सुरू होईल. त्यानंतर दरात काहीशी घसरण होईल. मार्चपासून पुन्हा स्थानिक डाळिंबाचा हंगाम सुरू होईल, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.(Latest Pune News)
बाजारात चमेली बोरांची आवक घटली आहे. तर, उमराण बोरांची आवक वाढली आहे. पावसामुळे बोरांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. मात्र, आवक-जावक कायम असल्याने बोरांचे दर टिकून आहेत. छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर भागातून मोसंबीची आवक वाढली असून तिच्या गोडीतही वाढ झाल्याने मोसंबीला मागणी चांगली आहे.
फळबाजारात रविवारी (दि. 9) मोसंबी 80 ते 90 टन, संत्रा 25 ते 30 टन, डाळिंब 50 ते 60 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबे सुमारे तीन हजार गोणी, कलिंगड 3 ते 4 टेम्पो , खरबूज 1 ते 2 टेम्पो, चिक्कू 1 हजार डाग, पेरू 800 ते 900 क्रेट, अननस 8 ट्रक, बोरे 200 ते 250 पोती तर सीताफळाची 10 ते 15 टन इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : 100-250, मोसंबी : (3 डझन) : 110-320, (4 डझन) : 50-180, संत्रा : (10 किलो) : 400-1000, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : 60-200, आरक्ता : 5-50, गणेश : 5-25, कलिंगड : 10-20, खरबूज : 30-50, पपई : 8-20, चिक्कू (दहा किलो) : 100-500, पेरु (20 किलो) : 300-500, अननस (1 डझन) : 100-500, सिताफळ (1 किलो) : 20-100, बोरे (10 किलो) : चमेली 300-350, चेकनट 800-900, उमराण 80-100, चण्यामण्या 650-700. सफरचंद : काश्मीर (14 ते 16 किलो) : 1000-1400, किन्नोर (10 किलो) 1600-1800.