मोशी : दिवाळीनंतर थंडी जास्त जाणवत आहे. परिणामी, त्याचा प्रादुर्भाव फळांवर झाला आहे. डिसेंबर महिन्यात दाट धुके व बदलत्या वातावरणामुळे फळांचे दर दहा टक्क्यांनी घसरले आहेत. तरीही आरोग्यवर्धक फळांना मागणी असल्याची माहिती मोशी कृषी उत्पन्न उपबाजार समितीमधील फळ विक्रेत्या व्यापार्यांनी दिली.
अफगाण, तुर्की, इटली, इराण या देशांमधून सफरचंद आयात होत आहेत. तर, किवी हे फळ अमेरिका या देशांमधून आयात होत आहे. त्यामुळे फळांचा दर्जा हा उत्कृष्ट आहे. तसेच, मोशीमधून फळे निर्यातदेखील होत आहेत. राज्यात ठिकठिकाणी फळांचा पुरवठा केला जात आहे.
थंडीच्या काळात बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे मुबलक प्रमाणात आणि कमी किमतीत उपलब्ध असतात. थंडीच्या काळात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. तसेच, वर्षभर तब्येत ठणठणीत राहावी यासाठी या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रतिकारशक्ती चांगली राहावी यादृष्टीने या काळात व्यायाम करणे,आहारात जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थांचा समावेश करणे या गोष्टी आवर्जून केल्या जातात. स्ट्रॉबेरी, संत्री, सीताफळ, डाळींब, सफरचंद, आवळा ही फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला आवश्यक आहेत.
ढगाळ वातावरणामुळे संत्रीचे दर घसरले आहेत. पपई मागील आठवड्यात 35 ते 40 रुपये व पेरू 40 ते 42 व डाळिंब 200 रुपये किलोप्रमाणे होते. या आठवड्यात दर उतरले आहेत. मात्र, गिर्हाईकांची गर्दी नेहमीप्रमाणे आहे.
– मारुती बिराजदार, व्यापारी, मोशी उपबाजार समिती
हेही वाचा