पेठ : पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील अनेक शेतकर्यांनी उन्हाळी बटाटा पीक घेतले आहे; मात्र विहिरीतील पाण्याची पातळी घटल्याने बटाटा पिकाला पाणी देणे शेतकर्यांना अशक्य होत आहे. परिणामी बटाटा पीक करपू लागले आहे.
बटाटा पिकास चांगली खते, औषधे, फवारणी करावी लागत आहे.
परिणामी बटाटा पीक आले चांगले, पण पुढील पाणी बटाट्याला देताना कसे द्यावे अशी चिंता शेतकर्यांना लागली आहे. याबाबत शेतकरी विशाल कराळे, ज्ञानेश्वर माउली एरंडे यांनी चिंता व्यक्त केली. सध्या वेळ नदी, तसेच विहिरींना पाणी नाही. पाऊस झालाच नाही.
त्यामुळे सध्या असलेली पाणी व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. शेतातील बटाटा पीक हे आता तीन महिन्याचे झाले आहे. पीक जोमात आलेले असताना आता कडक ऊन पडले आहे. उन्हाने बटाटा पिकाची पाने करपू लागली आहेत, असे शेतकरी सोपानराव नवले, तंटामुक्त समितीचे बाबाजी कुदळे यांनी सांगितले. सातगाव पठार भागातील बटाटा पिकास पाऊस नसल्याने शेतकरी आता ठिबक तुषार सिंचन योजना वापरायच्या बेतात असल्याचे वसंतराव एरंडे व ग्रामपंचायत सदस्य संजय पवळे यांनी सांगितले.
हेही वाचा