पुणे: शिक्षण आयुक्तालयाने ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक पदभरतीची प्रक्रिया गतिमान केली आहे. त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि खासगी शैक्षणिक संस्थांना रिक्त शिक्षकपदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 31 मे 2026 पर्यंतचा कालावधी निश्चित करून दिला आहे. शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी स्पष्ट आदेश जारी केले आहेत.
माध्यमिक शाळांमधील रिक्तपदांचा आढावा घेतला असून, मे 2026 अखेरपर्यंत रिक्त होणाऱ्या संभाव्य पदांना विचारात घेऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नियुक्ती प्राधिकाऱ्यांना रिक्तपदांच्या 80 टक्के मर्यादेत मागणी नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केली आहे. यामुळे रिक्तपदांची नेमकी संख्या पवित्र पोर्टलवर उपलब्ध होणे सोपे झाले आहे. आता सर्व संबंधित संस्थांनी दिलेल्या मुदतीत जाहिराती प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण आयुक्तालयाने केले आहे.
ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेवर बऱ्याच प्रमाणात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. विशेषत: ग््राामीण भाग आणि खासगी संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे.
उमेदवारांनी पवित्र पोर्टल नियमित तपासणे आणि अधिकृत जाहिरातींनुसार अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 31 मे नंतर कोणत्याही नवीन जाहिराती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाने वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.