पुणे: पाषाण ते कोथरूडदरम्यानचा सुमारे ४० मिनिटांचा प्रवास भविष्यात अवघ्या १० मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पाषाण-पंचवटी-कोथरूडला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी पाताळलोक रस्ता बोगदा प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला आता वेग येण्याची चिन्हे आहेत.
सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या बोगद्याच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याकरिता महापालिकेने निविदा मागविल्या असून, या निविदा २७ ऑगस्ट २०२६ रोजी उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
पाषाण, पंचवटी आणि कोथरूड या भागांना जोडणारा हा भुयारी मार्ग शहरातील वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या गर्दीच्या वेळेत पाषाणहून कोथरूडला जाण्यासाठी वाहनचालकांना ४० मिनिटे लागतात. प्रस्तावित बोगदा पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या १० मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे पाषाण-कोथरूडदरम्यानचा प्रवास अधिक जलद होण्यासोबतच परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. वाढती लोकसंख्या, दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
शहरातील पहिला भुयारी मार्ग
प्रस्तावित बोगद्याची लांबी तीन किलोमीटर असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणे शहरातील पहिला शहरी रस्ता बोगदा ठरणार आहे. सध्या या प्रकल्पाचे अलाइनमेंट प्राथमिक स्वरूपात असून, अंतिम आराखडा तयार करताना त्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर बोगद्याच्या प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक अभ्यास, अंतिम आराखडा, बांधकामाची पद्धत, तसेच अन्य तांत्रिक बाबींना अधिक स्पष्टता मिळणार आहे. त्यामुळे २७ ऑगस्टला उघडण्यात येणाऱ्या निविदांकडे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.