बिबेवाडी : पर्वती पायथा ते मित्रमंडळ चौकादरम्यान समान पाणीपुरवठा व ड्रेनेजलाइनचे काम झाल्यानंतर राडारोडा रस्त्यावर पडून आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मात्र, महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी पडलेला राडारोडा तातडीने उचलून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
प्रभाग क्रमांक 29 मधील मित्रमंडळ चौक ते पर्वती गावदरम्यान समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच ड्रेनेज लाइनचे कामही करण्यात आले आहे. हे काम पूर्ण होऊन चार महिने झाले आहेत. मात्र, सिमेंटचे जुने पाइप व इतर साहित्य या रस्त्यावरील पूलाशेजारी अद्यापही पडून आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, परिसरात अस्वच्छताही निर्माण झाल्यानेे नागरिक त्रस्त झाले आहेत.
याबाबत महापालिकेच्या अधिकार्यांना वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहर उपाध्यक्ष दिलीप अरुंदेकर व शहर सरचिटणीस नारायण तेलंग यांनी सांगितले.
या कामामुळे परिसरातील रस्त्याची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे, याकडे देखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन कराव लागत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नुकतेच या ठिकाणी आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
महापालिका प्रशासनाने पर्वती परिसरातील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. गेल्या चार महिन्यांपासून या रस्त्याच्या कडेला जुने पाइप व राडारोडा पडून आहे, तो लवकर उचलला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.दिलीप अरुंदेकर, शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
मित्रमंडळ चौक ते पर्वती गाव रम्यान समान पाणीपुरवठा योजनेचे काम केल्यानंतर उर्वरित राडारोडा, जुन्या जलवाहिनीचे पाइप व इतर साहित्य रस्त्यावर ठेवण्यात आले आहे, ते तातडीने उचलण्यास संबंधित ठेकेदाराला सांगितले आहे.दत्तात्रेय टकले, कार्यकारी अभियंता, समान पाणीपुरवठा विभाग, महापालिका