खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत, वरसगाव, मुठा खोर्यात सोमवारी (दि. 18) सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. नद्या, ओढे, नाले, दुथडी भरून वाहत असल्याने धरणसाठ्यात वेगाने वाढ सुरू आहे. सायंकाळी 5 वाजता धरणसाखळीत 26.80 टीएमसी म्हणजे 91.94 टक्के साठा झाला होता.
गेल्या 24 तासांत धरणसाखळीत 0.66 टीएमसी पाण्याची भर पडली. रविवारी (दि. 17) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 26.14 टीएमसी पाणी होते. टेमघर धरणातून 300 क्युसेक पाणी सोडले जात आहे. (Latest Pune News)
पानशेत आणि वरसगावच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने मंगळवारी (दि. 19) दोन्ही धरणांतून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून जादा पाणी मुठा नदीत पाणी सोडावे लागणार असल्याने जलसंपदा विभागाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत व वरसगाव धरण क्षेत्रातील तव, धामण ओहोळ, साखरी, मुगाव, दापसरे, कुर्तवडी, टेकपोळे, माणगाव आदी ठिकाणी संततधार पावसासह अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. मोसे, आंबी नद्या ओढे दुथडी भरून वाहत आहेत.
पानशेत व वरसगावमध्ये 94 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. धरणक्षेत्रात संततधार पाऊस असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. 96 टक्के पाणीसाठा झाल्यावर दोन्ही धरणांतून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे खडकवासलातून जादा पाणी मुठा नदीत सोडले जाणार आहे.- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग