पुणे

नव्या कृषी क्रांतीची गरज : रामदास आठवले

Sanket Limkar

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी नव्याने कृषी क्रांती घडवून आणण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी व्यक्त केले. पीएम किसान निधी योजनेंतर्गत शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी इथून दूरस्थ पद्धतीने झाले, त्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित किसान संमेलनात आठवले बोलत होते.

या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, संचालक शशिकांत वाजगे, तानाजी वारुळे, अल्हाद खैरे, रत्नदीप भरविरकर, रमेश जुन्नरकर, डॉ. संदीप डोळे, एकनाथ शेटे, ऋषिकेश मेहेर, देविदास भुजबळ, देवेंद्र बनकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कृषी अधिकारी प्रदीप बनकर, गणेश भोसले आदी मान्यवर आणि जिल्ह्यातील सुमारे 300 हून अधिक शेतकरी, महिला शेतकरी सहभागी झाले होते.

"शेतकरी बळकट, तर देश बळकट"

केंद्रातर्फे आयोजित प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतलेल्या काही निवडक महिलांना या वेळी आठवले यांच्या हस्ते 'कृषिसखी' प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कृषीविषयक प्रदर्शनाला आठवले यांनी भेट दिली. याशिवाय कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनकार्याची माहिती घेतली.

आठवले म्हणाले की, चांगल्या आणि पोषक कृषी उत्पादनाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना अधिक सक्षम आणि बळकट केले पाहिजे. शेतकरी बळकट झाला तर देश बळकट होईल, हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शेतीला आवश्यक असणार्‍या पाण्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्याची गरज ओळखून नद्या जोडल्या पाहिजेत, कालव्यांची निर्मिती झाली पाहिजे. आजच्या शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील सुमारे 90 लाख शेतकर्‍यांना आणि पुणे जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT