बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला पराभवाची चव चाखावी लागल्यानंतर तब्बल दीड महिन्याने येत्या 14 जुलैला पक्षाच्या वतीने बारामतीत जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या अनुषंगाने तयारीचा एक भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हजेरी लावणार आहेत. हा मेळावा भविष्यातील वाटचालीबद्दल महत्त्वाचा संदेश देणारा ठरणार असल्याची चर्चा बारामतीत आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीत एकाही कार्यक्रमास उपस्थित राहिले नव्हते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बारामती ते काटेवाडीपर्यंत त्यांनी सहभाग घेतला होता.
मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्त केले आहे. 14 रोजी जनसन्मान रॅलीही आयोजित करण्यात आली आहे. ही रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचा संदेश देणारी ठरणार आहे.
या रॅलीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. बारामतीत पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्याही कार्यक्रमाला बारामतीत उपस्थित राहिले नव्हते. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पाठबळ मिळावे, यादृष्टीने 14 रोजी जनसन्मान रॅलीत ते सहभागी होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आगामी विधानसभेला अजित पवार यांच्यासमोर बारामतीत तगडे आव्हान असण्याची शक्यता आहे.
या रॅलीत उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार? याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, पवार पदाधिकार्यांना आणि कार्यकर्त्यांना काय संदेश देतात? याकडे लक्ष लागले आहे.