माझ्यावर मध्यंतरी झालेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत. आताच नाही तर भविष्यातही ते आरोप सिद्ध होणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवारांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एका व्हिडीओद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे.
राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदलला नाही. राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. अर्थसंकल्पामध्ये लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. पण त्याकडे विरोधक दुर्लक्ष करत आहेत. आता विधानसभा निवडणुकीत काही
लोक तुमच्याकडे येतील. भाषणे भावनिक करतील. पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अजित पवार हा नेहमीच काम करणारा आहे. आज अर्थसंकल्पावर टीका करणारे कोण आहेत याचा विचार केला पाहिजे. त्यांना विकासापासून तुम्हाला दूर ठेवायचा आहे, असे त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
सुळे दरम्यान, अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले आहेत. आता अजित पवार यांच्यावरील भष्ट्राचाराच्या आरोपांचे उत्तर भाजपानेच द्यावे, असा टोला खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. या अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे.
पण या योजनेवर अजित पवार यांच्या लाडक्या बहिणीने टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकार जुमल्यांचा पाऊस पाडत आहे. पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार सरकारने केला पाहिजे. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि पैसे वापरले जात आहेत, असा आरोपही सुळे यांनी केला आहे.