पुणे: देशभरातील ४८ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६'साठी निवडण्यात आले असून, त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या शिक्षकांचा गौरव शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबरला नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जाणार आहे.
बीडमधील केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात कार्यरत डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे यांनी दिव्यांग आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसह वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यापन करीत त्यांनी शैक्षणिक गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे.
नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक १८ मधील कुंदा जयवंत बच्छाव यांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले. 'मिशन मोबाईल-फ्री'अंतर्गत ज्ञानभिंती आणि आनंदवली शिक्षण कट्टा, यांसारख्या उपक्रमांसोबत अमेरिकेतील शाळांशी ई-ट्विनिंगद्वारे संवाद साधून विद्यार्थ्यांना डिजिटल आणि आंतरराष्ट्रीय अनुभव दिला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन दृष्टिकोन विकसित झाला. लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयातील वैभव वसंतराव कुलकर्णी यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी शालेय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी केली. सातारा येथील सैनिक स्कूलमधील शिवप्रसाद अरविंद टिंगरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजवली. एनडीए आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करून त्यांनी भावी लष्करी अधिकारी घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे तीन टप्पे पार पाडण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर १५ जून ते २० जुलै २०२६ दरम्यान पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन स्वीकारण्यात आले.
विद्यार्थ्यांची प्रगती, नावीन्यपूर्ण अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास, शाळेची गुणवत्तावाढ आणि वंचित घटकांसाठीचे कार्य या आधारे अंतिम ४८ शिक्षकांची निवड झाली. ५ सप्टेंबर रोजी विज्ञान भवनात होणाऱ्या समारंभात पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्याचे लघुपट दाखविले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.