Food Adulteration Pudhari
पुणे

Food Adulteration Highway Hotels: नसरापूर परिसरात हॉटेल्सवर भेसळ व नियमभंगाचा आरोप वाढला

पुणे-सातारा महामार्गावरील अनेक हॉटेल्समध्ये मोफत पाणी न देणे, भेसळयुक्त व मुदतबाह्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची मागणी तीव्र

पुढारी वृत्तसेवा

नसरापूर: अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी तसेच हॉटेलमध्ये ग्राहकांना मोफत पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याचे अन्न व औषध प्रशासनाने आदेश दिले असतानाही पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी न देता टेबलावर बाटलीबंद पाणी ठेवले जात असून, काही हॉटेलमध्ये भेसळयुक्त तसेच मुदत संपलेल्या शीतपेये व खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे बोलले जात आहे.

ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी देणे, हॉटेल व रेस्टॉरंटसाठी बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अनेक हॉटेलमध्ये या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना बाटलीबंद पाणी विकत घेण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार आहे.

महामार्गावरील शिंदेवाडी, वेळू, खेडशिवापूर टोल नाका, वरवे, केळवडे, चेलाडी फाटा, कामथडी, कापूरहोळ, भोर फाटा, किकवी आणि सारोळा परिसरात शंभरहून अधिक लहान-मोठी हॉटेल आहेत. संबंधित अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रभावी तपासणी होत नसल्याने काही ठिकाणी मुदतबाह्य व भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

काही हॉटेल व्यावसायिकांकडून खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचीही चर्चा आहे. याबाबत ग्राहकांनी जाब विचारल्यास त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे सांगितले जाते. तसेच, महामार्गावरील दुभाजक तोडणे, हॉटेलमधील सांडपाणी रस्त्यावर सोडणे आणि उरलेले अन्न, प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य कचरा महामार्गालगत टाकल्याने परिसरात अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. भेसळयुक्त व मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हॉटेलचालकांवर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.

तक्रारींसाठी हेल्पलाइन

अशा प्रकारच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने १८००-२२२-३६५ हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. ग्राहकांनी फसवणूक किंवा नियमभंग आढळल्यास या क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT