पुणे: विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने त्यावर आता महाविकास आघाडीतच बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाने आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे, तर काँग्रेसनेही यापुढे आघाडीत राहायचे की नाही यासंबंधीचा निर्णय वरिष्ठच घेतील, असे सांगत राष्ट्रवादीच्या (श.प) निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे विजयी झाले.
मात्र, आता पाटील यांनी उमेदवारी माघार घेतल्याने त्यावरून काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेने पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोपांचे बाण सोडले आहेत. याबाबत ठाकरे गटाचे शहरप्रमुख वसंत मोरे म्हणाले, तिसऱ्यांदा विश्वासघात झाला आहे. या निवडणुकीत शंभर टक्के सेटलमेंट आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला आहे. पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असे मी वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे, त्यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील.
दोन्ही राष्ट्रवादींच्या भाऊबंदकीमुळे आघाडीचे नुकसान होत असल्याचा आरोपही मोरे यांनी केला. महापालिका निवडणूक असो की अन्य निवडणुका काँग्रेसचा कायमच घात झाला असल्याचा आरोप प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केला आहे. माघारीचा निर्णय घेताना काँग्रेस नेत्यांना कळवायला पाहिजे होते.
पवार गट पुण्यातील नेत्यांना किती किंमत देतो, हे महापालिका निवडणुकीत दिसून आले होते. स्वत:च्या राजकारणासाठी पुण्यातील काँग्रेसला धोका देणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे, असेही बालगुडे यांनी म्हटले आहे. एकंदरीतच विधान परिषदेवरून महाविकास आघाडीत रणकंदन माजले आहे.