पुणे: राज्याच्या कानाकोपर्यात, अतिदुर्गम भागातील खेड्या पाड्यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळांची बस म्हणजे लालपरी अविरतपणे सेवा पुरवत आहे. नुकताच पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला आहे.
जे भाविक पायी पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी एस.टी. धावून आली. लाखो भाविक व वारकर्यांना या एसटीनं विठुरायाचं दर्शन घडवून आणलं. त्यामुळं एसटीला 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये उत्पन्न मिळवून दिलं आहे. (Latest Pune News)
आषाढी यात्रेनिमित्त 5200 जादा बसच्या माध्यमातून एसटीने तब्बल 9 लाख 71 हजार 683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
या भाविकांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5 हजार 200 जादा बसेस सोडल्या होत्या. 3 ते 10 जुलैदरम्यान या बसेसनी 21 हजार 499 फेर्या करून तब्बल 9 लाख 71 हजार 683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे. यातून एसटी महामंडळाला 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.
जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा 6 कोटी 96 लाख 3 हजार रुपयांनी जास्त आहे. सन.2024 साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न 28 कोटी 91 लाख 58 हजार रुपये इतके होते. अर्थात, एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी या वेळी केले.
हजारो एसटी कर्मचार्यांची मोफत भोजनव्यवस्था
आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये येणार्या एसटी कर्मचारी व अधिकार्यांची जेवणाअभावी गैरसोय होऊ नये, म्हणून सरनाईक यांनी स्वखर्चातून 5,6 व 7 जुलै रोजी मोफत जेवण, चहा-नाष्ट्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचार्यांनी घेतला. याबद्दल सर्व एसटी कर्मचार्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले आहेत.