पुणे : पुढारी वृत्तसेवा : वैधमापनशास्त्र (वजनमापे) विभागाच्या येरवडा येथे असलेल्या विभागीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी हे कार्यालय म्हणजे 'आओ जाओ घर तुम्हारा' असे बनवून ठेवले आहे. शासकीय कार्यालय असूनदेखील अधिकारी, कर्मचारी कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे वजनमापेबाबत तक्रारी घेऊन आलेले व्यापार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राज्याच्या विविध जिल्ह्यासह विभागात असलेल्या वैधमापनशास्त्र विभागापेक्षा अधिक महसूल पुणे विभागाकडून शासनाला दरवर्षी जात असतो.
मात्र, येरवडा येथे पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर या पाच जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी कार्यालयात दिवसभर नसल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रतिनिधीने मंगळवारी सकाळी या कार्यालयाला भेट दिली. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही कार्यालयात कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी आला नाही.
या कार्यालयाचे सहनियंत्रक गेल्या सहा महिन्यांपूर्वी निलंबित झाले असून, त्यांच्या जागी अजून कोणत्याही अधिकार्याची पूर्णवेळ नियुक्ती झालेली नाही. सध्या छत्रपती संभाजीनगरमधील सहनियंत्रक सुरेश चाटे यांच्याकडे सध्या या कार्यालयाचा पदभार आहे. त्यामुळे या विभागातील कामांचा खोळंबा होऊ लागला आहे.
हेही वाचा