आळंदी: आळंदीकरांचा निरोप घेत माउलींची पालखी शुक्रवारी (दि.२०) सकाळी सातच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली. यावेळी सर्व आळंदीकर आपल्या माऊलींना निरोप देताना भारावले होते. महिनाभराचा दुरावा ठेवत माऊली पुण्याकडे मार्गस्थ झाली.
इंद्रायणी माउलींची साद घेत वाहत असणारी इंद्रायणी चंद्रभागेला गळाभेट घेण्यासाठी जोरदारपणे वाहत असल्याचे आज काहीसे चित्र होते. हरिनामाच्या गजरात गुरूवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले होते. (Latest Pune News)
तद्नंतर ती पहिल्या मुक्कामासाठी नवीन दर्शनबारी मंडपात दाखल झाली होती. सकाळी नित्य धार्मिक विधी उरकत शितोळे सरकार यांच्या वतीने नैवद्य दाखविल्यानंतर पालखी सातच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी वारकऱ्यांसाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी चहा, नाष्टा व फळे मोफत उपलब्ध करून देत वारीत आपला सहभाग नोंदवला.
सकाळी दहाच्या सुमारास पालखी विसाव्यासाठी थोरल्या पादुका मंदिर, भोसरी फाटा, साईमंदिर येथे विसावली. येथे समाज आरती घेण्यात आली. तदनंतर पालखी दुपारच्या विसाव्यासाठी फुलेनगरकडे रवाना झाली. चऱ्होली, वडमुख वाडी, चोवीसावाडी, दिघी मँगझिन, साई मंदिर आदी भागातील नागरिकांसह पंचक्रोशीतील मोशी, डुडुळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, केळगाव, मरकळ, सोळु, धानोरे, गोलेगाव आदी गावांतून नागरिक माऊलीना निरोप द्यायला पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.