पुणे

Manchar Rain: डिंभे धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढवला; घोड नदीकाठच्या नागरिकांना इशारा

धरणाच्या सांडव्यातून ८,५०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी (दि. ३१) सकाळी साडेदहा वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून करण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली.

धरणाच्या सांडव्यातून ८,५०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तसेच, जलविद्युत केंद्रातून ५५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सिंचनासाठी कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणातून एकूण ९,०५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. यापैकी ८,९७० घनफूट प्रतिसेकंद पाणी घोड नदीपात्रात, तर उजव्या कालव्यातून ८० घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे.

धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने पुढील काळात विसर्गात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. त्यामुळे घोड नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे. जनावरे व शेतीची साधने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

डिंभे धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विसर्ग वाढविण्यात आला आहे. घोड नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
दत्तात्रय कोकणे, उपअभियंता, जलसंपदा विभाग, कुकडी प्रकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT