मंचर: आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक येथील अश्विनी तानाजी वालकोळी आणि त्यांच्या दोन लहान मुलांच्या मृत्यूप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ४) रात्री पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अश्विनी वालकोळी यांच्या आई मंगल देवराम भांगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी वालकोळी (वय २८), त्यांची मुलगी अक्षता तानाजी वालकोळी (वय ५), मुलगा कार्तिक तानाजी वालकोळी (वय ३) यांच्या मृत्यूप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, अश्विनी यांना त्यांचे पती तानाजी शंकर वालकोळी, सासू सीताबाई शंकर वालकोळी, दीर शिवाजी शंकर वालकोळी आणि जाऊ सुनीता शिवाजी वालकोळी हे कौटुंबिक कारणांवरून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होते.
त्यांच्याकडून मारहाण, शिवीगाळ तसेच दमदाटी केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अश्विनी यांच्या दोन लहान मुलांनाही त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या छळाला कंटाळून अश्विनी यांनी मुलगी अक्षता व मुलगा कार्तिक यांच्यासह बुधवारी (दि. ४) करवंदेदरा परिसरातील सार्वजनिक विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी दिली.