मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला चिंचवड-पुणे येथे आयोजित महोत्सवात मोठी मागणी मिळाल्याने आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळाले आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या स्ट्रॉबेरीची चव आणि गुणवत्ता ग््रााहकांच्या पसंतीस उतरल्याने मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या उपक्रमामुळे शेतकरी आणि ग््रााहक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन दलालांची साखळी तुटली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळाला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव आणि ‘एसआयआयएलसी पुणे’ यांच्या वतीने चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय ‘स्ट्रॉबेरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल झाली असून, दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा देणारा ठरला आहे.
आंबेगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी केलेल्या मागणीची दखल घेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार आदिवासी व कृषी विभागाने विशेष योजना राबवली. यामध्ये उच्च प्रतीची 3125 स्ट्रॉबेरी रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच तसेच आवश्यक जैविक व सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविण्यात आली.
तसेच राज्य व जिल्हास्तरावर प्रशिक्षण आणि अभ्यास दौरे आयोजित करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान देण्यात आले. या योजनेत सहभागी झालेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर व आहुपे खोऱ्यातील 183 आदिवासी शेतकऱ्यांनी यशस्वी लागवड करून भरघोस उत्पादन घेतले आहे.
महोत्सवात ताज्या स्ट्रॉबेरीसह स्ट्रॉबेरी बर्फी, जॅम, लस्सी, सिरप, मुखवास आणि गुलकंद यांसारख्या प्रक्रियायुक्त उत्पादनांनाही मोठी मागणी मिळाली. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पद्मभूषण गिरीश प्रभुणे, राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या आयुक्त मंजिरी मनोलकर, इस्त्रोचे शास्त्रज्ञ दिलीप देशमुख, प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आदी उपस्थित होते.