पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा अंतरिम निकाल उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु, अंतिम निकाल केव्हा लागणार? याबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता हा निकाल मंगळवारी 3 फेबुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा निकालाचा टक्का देखील वाढणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या टीईटीला प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या चांगलीच वाढली. या परीक्षेसाठी राज्यभरातील 4 लाख 75 हजार 668 उमेदवारांनी नोंदणी केली होती.
राज्यातील 1420 परीक्षा केंद्रांवर या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर परीक्षेची उत्तरसूची जाहीर केली, नंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये अंतरिम निकाल पाहण्यास उपलब्ध करून दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेच्या निकालात सुमारे दहा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, सीटीईटी परीक्षा जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रशिक्षणाच्या दिवशी येत असल्याने सीटीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे. तर, सीटीईटीपूर्वी टीईटीचा निकाल जाहीर करावा, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेने टीईटीच्या अंतिम निकालाची तयारी पूर्ण केली आहे. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे संबंधित प्रश्नांचा गुण वजा करून उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या गुणोत्तरात बदल होणार आहे.
नोकरी टिकविण्यासाठी टीईटी उत्तीर्ण आवश्यक
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांना नोकरी टिकविण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे टीईटीत उत्तीर्ण होण्यासाठी सेवेत कार्यरत असणारे सर्वच शिक्षक प्रयत्न करीत आहेत. परीक्षा परिषदेकडून टीईटीचा अंतिम निकाल केव्हा लागणार, याची वाट सर्व उमेदवार पाहत आहेत. मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याने आपण उत्तीर्ण झालो किंवा नाही, हे सर्व उमेदवारांना समजणार आहे.