पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून (दि. 20 फेब्रु.) राज्यभरात दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी 23, 683 शाळांमधील 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा 3 हजार 879 विद्यार्थी वाढले आहेत. राज्यातील 5 हजार 111 मुख्य केंद्रांवर संबंधित परीक्षा पार पडणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ.दीपक माळी यांनी दिली आहे.
पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 20 फेबुवारी ते 18 मार्चदरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा नोदणी केलेल्या 16 लाख 15 हजार 481 विद्यार्थ्यांमध्ये 8 लाख 65 हजार 740 मुले, 7 लाख 49 हजार 736 मुली, तर 13 तृतीयपंथी विद्यार्थी आहेत.
परीक्षेदरम्यान संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली. विद्यार्थ्यांनी राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेलेच वेळापत्रक ग््रााह्य धरावे. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या 9 जानेवारीच्या शासननिर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरातील छायांकित प्रतीची दुकाने (झेरॉक्स केंद्र) बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे, कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास संबंधितांवर दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची जिल्हा दक्षता समितीची जबाबदारी आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील राज्य मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनो, नैराश्य आले तर कॉल करा!
दहावी परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी परीक्षेच्या भीतीमुळे, नकारात्मक विचारांमुळे किंवा अपेक्षांच्या दडपणाखाली मानसिक तणाव अनुभवतात. अशा विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विशेष समुपदेशन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या स्तरावर 10 तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, विभागीय मंडळस्तरावर जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशक कार्यरत आहेत. हे समुपदेशक विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणार असून, अभ्यासाबाबतच्या अडचणी, मानसिक भीती, संभम तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आवश्यक सल्ला देणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध
राज्य मंडळ आणि नऊ विभागीय मंडळांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कोणताही मानसिक ताण, भीती, अस्वस्थता किंवा मार्गदर्शनाची गरज भासल्यास विद्यार्थी या हेल्पलाईनवर थेट संपर्क साधू शकतात. परीक्षा हा आयुष्यातील एक टप्पा असून, तणाव न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, अडचण आल्यास मदत मागण्यास संकोच करू नये, असे आवाहन राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.
समुपदेशकांचे भमणध्वनी क्रमांक
9960644411, 7972573742, 9834084593, 9359978315, 8169202214, 9371661255, 7208429381, 7709156068, 8421150528, 9404783996 या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.