

पुणे: आगामी 2026-2027 च्या राष्ट्रीय जनगणनेत भटक्या व विमुक्त समाजाची अचूक नोंदणी व्हावी, यासाठी या समाजाला स्वतंत्र ओळख आणि स्वतंत्र रकाना देण्यात यावा, अशी आग््राही मागणी ‘एकात्म अखिल भारतीय घुमंतू विमुक्त जनहित महिला संघटना (महाराष्ट्र)’ यांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष उर्मिला पवार, डॉ. शिवलाल जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. देशात 20 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेला हा समाज आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. जनगणनेच्या अर्जातील प्रश्न क्र. 12 मध्ये सध्या केवळ ‘इतर’ हा पर्याय उपलब्ध आहे, जो या समाजाच्या हिताच्या दृष्टीने अपुरा आहे.
जनगणनेत समाजासाठी स्वतंत्र, स्पष्ट आणि ठळक रकाना असावा, महाराष्ट्र राज्याप्रमाणेच प्रत्येक राज्याच्या जातींची यादी प्रश्नावलीसोबत जोडणे अनिवार्य करावे, अचूक माहितीसाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन जनजागृती मोहीम राबवावी, प्रश्नावली प्रादेशिक भाषेत आणि सोप्या शब्दांत असावी, अशी मागणी यावेळी केली असून, सरकारने या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले.