आशिष देशमुख
पुणे: यंदा जून महिन्यात राज्यातील तब्बल २१० तालुक्यांत केवळ २० ते २५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे हे तालुके ‘रेड झोन’ (तीव्र अवर्षणग्रस्त) गटात नोंदले गेले आहेत. राज्यातील ३६ पैकी २७ जिल्ह्यांत अत्यल्प, तर सात जिल्ह्यांत अल्प पाऊस झाल्याची नोंद आहे.
यंदा मान्सून महाराष्ट्रात ५ जून रोजीच दाखल झाला. मात्र, तो सोलापूर-बारामती भागात अडकून पडला. उत्तर भारतातून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी महाराष्ट्रातील मान्सूनचे बाष्प पळवून नेले. त्यामुळे अशी स्थिती यंदा झाल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले आहे.
जूनच्या १८ दिवसांचा ताळेबंद तपासला असता असे लक्षात येते की, १८ दिवसांत ३५५ पैकी २१० तालुक्यांत अत्यल्प (२५ मि.मी. पेक्षा कमी) पाऊस झाला आहे. उर्वरित ठिकाणी अल्प पावसाची नोंद झाली आहे. कुठेही अतिमुसळधार, मुसळधार असा पाऊस झालेला नाही.
जूनची सरासरी?
राज्याची जून महिन्याची पावसाची सरासरी १४० ते १५० मि.मी. आहे.
कोकणात ५०० मि.मी.पेक्षा जास्त, मराठवाडा, विदर्भात १०० ते १५० मि.मी.च्या आसपास
राज्यात २० जूनपर्यंत सरासरी केवळ २५ टक्के पाऊस पडला.
राज्यात १ ते १५ जूनदरम्यान १०३.८ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात २७.४ मि.मी. पाऊस झाला.
राज्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ २५ ते २६ टक्के पाऊस पडला आहे. एकूण तूट ७४ ते ७५ टक्के इतकी नोंदवण्यात आली.