पुणे: राज्याच्या कृषी विभागाच्या प्रस्तावित अतांत्रिक (प्रशासन विभाग) आकृतीबंध रद्द करुन या विषयावर तज्ज्ञ समिती गठित करावी तसेच शेतकरी केंद्रित व सक्षम नवीन आकृतीबंध तयार करुन तो मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघाने केली आहे.
मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सर्व तांत्रिक संघटनांनी (कृषी अधिकारी) महासंघाच्या नेतृत्वाखाली टप्पेनिहाय तीव्र आंदोलन करणार असून दिनांक 4 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य उप कृषी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटना पुणे, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग २ राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना यांच्यासह कृषी सहसंचालक/कृषी संचालक प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने दिनांक 19 ऑगस्टला पत्र देऊन काही मागण्याही केल्या आहेत.
विद्यमान आकृतीबंधामध्ये केवळ किरकोळ बदल करुन तोच आकृतीबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते. त्यामुळे मलमपट्टी स्वरुपातील आकृतीबंधास ठाम विरोध असून तो पूर्णतः रद्द करुन नव्याने आकृतीबंध करण्याची ठाम भुमिकाही महासंघाने घेतली आहे.
असे असतील आंदोलनाचे टप्पे...
काळ्या फिती लावून निषेध हा दिनांक 24 व 25 ऑगस्ट रेजी व्यक्त करणे.
व्हॉटसॲप ग्रुपमधून दिनांक 27 ऑगस्टला बाहेर पडणे.
रात्री उशिरापर्यंत दिनांक 28 ऑगस्टपर्यंत काम करणे.
लेखणी बंद आंदोलन, सर्व बैठकांना अनुपस्थिती आणि दिनांक दिनांक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपासून रिपोर्टिंग थांबविणे.
सामूहिक रजा - जिल्हा व आयुक्तालय स्तरावर ठिय्या आंदोलन हे दि. 2 व 3 सप्टेंबर रोजी करणे.
बेमुदत कामबंद आंदोलन दिनांक 4 सप्टेंबरपासून करण्यात येणार.