पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कृषी शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्न तंत्रज्ञान, बी.एस्सी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान, बी. टेक. जैवतंत्रज्ञान बीएससी (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
या पहिल्या यादीत १८ हजार ९९३ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ९७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच, पहिल्या यादीमध्ये ३ हजार १४७ विद्यार्थांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. राज्यात कृषी अभ्यासक्रमासाठी ३ हजार १४७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यांचे प्रवेश ऑटो फ्रिज झाले आहेत. या विद्यार्थ्याना या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे.
या विद्यार्थ्यांनी जर काही कारणाने हा प्रवेश नाकारला तर या विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत उतरता येणार नाही. त्यांना थेट त्यानंतरच्या कॅप व संस्थात्मक फेरीत उतरावे लागेल. राज्यात कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २३ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत १८ हजार ९९३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतिक्रम भरले होते. यामधील १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत विविध पसंतिक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश उपलब्ध झाले आहेत.
विद्यापीठनिहाय जागावाटप
राज्यातील कृषी अभ्यासक्रमाच्या १० हजार ८७१ प्रवेशाचे जागावाटप विद्यापीठनिहाय केले असून राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व त्याच्या अंतर्गत महाविद्यालयाला ४ हजार ७०० जागांचे वाटप झाले आहे. तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व व त्याच्या अंतर्गत महाविद्यालयाला २ हजार ९६८ जागांचे वाटप झाले आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व त्याच्या अंतर्गत महाविद्यालयाला २ हजार ४६९ जागांचे वाटप झाले आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व त्याच्या अंतर्गत महाविद्यालयाला ७३४ जागांचे वाटप झाले आहे. विद्यार्थ्यांना १७ ते १९ ऑगस्ट २०२६ दरम्यान मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे. तर २० ऑगस्टला दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा जाहीर करण्यात येतील.