पुणे: पुढारी वृत्तसेवा
लॉ कॉलेज रस्त्यावरील आठवले चौक सुशोभीकरण कामाच्या 'गचाळ' नियोजनाचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. याठिकाणी झालेल्या अपघातामध्ये नुकतेच एक ज्येष्ठ नागरिक जायबंदी झाल्याने भाजपच्या स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी या कामावर सडकून टीका करत सत्ताधार्यांना घरचा आहेर दिला आहे.
आठवले चौकात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महिनाभरापासून चौक सुशोभीकरणाच्या नावाखाली स्मार्ट पदपथ बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच पाच रस्ते एकत्र येत असलेल्या या चौकामध्ये स्मार्ट सिग्नलसाठी केबल टाकण्याकरिता रस्त्यांवर चर खोदण्यात आले आहेत. या सर्व कामांसाठी वापरण्यात येणारे क्रश्ड सँड आणि राडारोडा रस्त्यावर पसरला आहे. याठिकाणी काय काम सुरू आहे, याचे फलकही लावण्यात आलेले नाहीत.
या बेपर्वाईचा फटका एका ज्येष्ठ नागरिकाला बसला आहे. दुचाकी साधारण वेगात असतानाही राडारोड्यावरून घसरली. यामुळे दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक जायबंदी झाले. निष्काळजीपणे सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, याला केवळ स्मार्ट सिटीच कारणीभूत असल्याचा आरोप नगरसेविका सहस्रबुद्धे यांनी केला आहे.
स्मार्ट सिटीच्या वतीने चौक सुशोभीकरणाच्या कामाची माहिती देण्यात आलेली नाही. नागरिकांच्या माहितीसाठी फलकही लावलेले नाहीत. हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून कामाच्या ठिकाणी रस्त्यावर क्रश्ड सॅन्ड आणि राडारोडा विखुरलेला आहे. यासंदर्भात नागरिकही वेळोवेळी तक्रार करत आहेत. अखेर कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी उभे राहून संबंधित ठेेकेदारांकडून रस्त्यावरील राडारोडा व क्रश्ड सॅन्ड काढून घेतली, परंतु स्मार्ट सिटीच्या बेफिकिरीचा नागरिकांना भुर्दंड का?
–माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेविका