पुणे

झोपडपट्ट्यांतील जगणंच धोकादायक; दाटीवाटीमुळे आगीच्या घटना

Laxman Dhenge

पौडरोड : पुढारी वृतसेवा : नागरीकरणात मोठ्या झपाट्याने वाढलेली वस्ती, टेकड्यांवर वाटेल तशी बांधलेली घरे, कच्च्या बांधकामांवर
बेकायदेशीरपणे चढवलेले मजल्यांवर मजले, विजेच्या खांबांवर लटकलेल्या विद्युत तारा, अतिक्रमणांमुळे रोखलेला विकास, दाटीवाटीमुळे होणार्‍या आगीच्या घटना, ही आहे पौड रस्त्यावरील रहिवाशांची स्थिती. त्यामुळे या झोपड्यांमधील एकूणच जगणं धोकादायक झाले आहे.

एकीकडे पुणे शहराची मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण झाली असताना आता दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या घरांच्या समस्या उग्र होत आहेत. काही महिन्यांपूर्वी केबल टाकताना दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आणि काही दिवसांपासून आगीच्या घटना घडत आहे. त्यात जयभावानी मंदिराजवळील गोडाऊनला लागलेली आगसहित दोन-तीन दिवसांपूर्वी किष्किंदानगरमध्ये आगीची घटना घडली आहे. वाढते अतिक्रमण त्यात लहान रस्त्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची संभावना नाकारता येत नाही.

या परिसरात लग्नमंडपाचे साहित्य, गॅस फिलिंग, मोठ्या प्रमाणात भंगारवाले, बेकरीसारखे अनेक धोकादायक धंदे, एका माणसाला पायी जाणेदेखील कठीण होईल अशा पद्धतीने बांधलेली घरे, बारीक रस्ते, तसेच अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन, चेंबरवरच उभारलेली घरे, यामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायक पद्धतीने लटकत असल्याने शॉर्टसर्किट होण्याचा प्रचंड धोका असल्याचे निदर्शनास आले. आपत्ती आली तर अग्निशामक बंब, अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचणेदेखील कठीण झाले आहे. एखाद्याला तातडीची मदत लागली तरी त्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकत नाही.

भीतीच्या छायेत जगणारा भाग

राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) मधील लोकसंख्या साधारण 15 ते 20 हजार, किष्किंधानगरमधील 7 ते 8 हजार, जय भवानीनगरमधील 7 ते 8 हजार, हनुमाननगर, केळेवाडी 7 ते 8 हजार असे पौड रोडवरील वस्ती भागतील तब्बल 50 टक्के म्हणजे 40 ते 50 हजारहून अधिक लोक दररोजचे आपले मरण समोर ठेवून जीवन जगत असल्याचे पाहणीत दिसून आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT