राजगुरूनगर: रेटवडी (ता. खेड) येथे ओढ्यावरील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ३० वर्षीय तरुण दुचाकीसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ६) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. समीर भिमाजी जाधव (वय ३०, रा. रेटवडी, खालची ठाकरवाडी, ता. खेड) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
खेड तालुक्यात रविवारी रात्रीपासून सतत पावसाच्या सरी कोसळत असल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रेटवडी येथील एका दुकानात खालची ठाकरवाडी येथून समीर जाधव दुचाकीवर श्रीखंड व इतर किराणा सामान घेण्यासाठी आला होता.
घरी परत जाताना सतारकावस्तीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बंगलावस्ती येथील ओढ्याला आलेल्या पुरात तो अडकला. पाण्याचा वेग ओळखता न आल्याने तो दुचाकीसह वाहून गेला. दुचाकी मात्र रस्त्यावरील दगडांमध्ये अडकल्याने सापडली आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने समीरचा शोध सुरू आहे.