राजगुरुनगर: खेड तालुक्यातील गोलेगाव, खराबवाडी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या व वाणिज्य वापरात असलेल्या ३७३ मिळकती वर दोन दिवसांत बुलडोझर फिरणार आहे.
या अतिक्रमण विरोधी कारवाई बाबतच्या अंतिम नोटीस संबंधित मिळकत धारकांना देण्यात आल्या असून २४ तासांत आपापली बांधकामे आणि साहित्य काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे साहित्य काढून न घेतल्यास त्या निष्कासित मिळकतीच्या मालकाच्या नावाने खर्चाचा बोजा इतर मिळतीवर नोंद करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी सांगितले.
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि २४) आयोजित पत्रकार परिषदेत श्री बेडसे आणि श्री शिंदे यांनी ही माहिती दिली. नायब तहसीलदार राम बीजे, चेतन मोरे यावेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यातही खेड तालुक्यातील गोलेगाव आणि खराबवाडी येथील गायरान जमिनीवरील मिळकती बाबतचा वाद उच्च न्यायालयात सुरू होता. त्याबाबत आदेश झाला असुन या दोन्ही ठिकाणच्या खासगी व खासगी संस्थांच्या सर्व प्रकारच्या मिळकतीवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येणार आहे. तुर्त वाणिज्य मिळकती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.
पावसाळा संपल्यावर म्हणजे सप्टेंबर महिन्यात रहिवासी असलेल्या मिळकतीवर सुद्धा ही धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाई मुळे चाकण परिसरातील दोन्ही गावांमध्ये खळबळ उडाली आहे.अनेकांचे लहान मोठे व्यवसाय गाळे, दुकाने पाडली जाणार असल्याने रोजंदारीचा प्रश्न उभा राहणार आहे.
अनेकांचे संसार उघड्यावर येणार आहेत. अतिक्रम विरोधी कारवाई होणाऱ्या मिळकती मध्ये खराबवाडी येथील एका खासगी संस्थेच्या शाळा इमारतीचा समावेश आहे. शालेय वर्ष सुरू झालेल्या अवस्थेत असताना येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधांतरी येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
चाकण लगतच्या खराबवाडी येथील २ एकर गायरान जागेत २८६ आणि आळंदी परिसरात असलेल्या गोलेगाव येथील दीड एकर (६० आर) गायरान क्षेत्रातील ८ ७ अशा एकुण ३७३ मिळकतीवर येत्या दोन दिवसांत बुलडोझर फिरणार आहे.