खडकवासला: जिल्ह्यातील शेतीसह पिण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या मुठा कालव्यातील गाळ उपसण्याचे काम खडकवासला जलसंपदा विभागाने तब्बल चार वर्षांनंतर सुरू केले आहे. मैला, सांडपाण्यासह कचरा साचल्याने गटारगंगा बनलेल्या कालव्यातील हजारो टन दुर्गंधीयुक्त राडारोडा, दलदल गाळ पाहून अधिकारी थक्क झाले.
जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाची पोकलेन ,जेसीबी, डंपर, डोझर आदी १५ यंत्रांच्या साहाय्याने खडकवासला धरणापासून मुठा कालव्यात साठलेला गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. हे काम उरुळी कांचनपर्यंत ४० किलोमीटर अंतरावर करण्यात येणार आहे.
या कालव्यातील गाळ, राडारोडा काढून सफाई करण्यात येणार आहे. धायरी, वडगाव, हिंगणे खुर्द, पर्वतीपासून पुढे मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे. सध्या पाऊस सुरू झाल्याने युद्धपातळीवर गाळ काढण्यासाठी आता नाम फाउंडेशनचे सहकार्य घेण्यात आले आहे. त्यानुसार ‘नाम’चे चार जेसीबी मशिनरी या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
कालव्याला अतिक्रमणांचा वेढा
अतिक्रमणे जमीनदोस्त करूनही कालव्याच्या दोन्ही तीरावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे उभी आहेत. लोकवस्त्या, सोसायट्यांचा मैलापाणी सांडपाण्यासह, पावसाचे पाणी थेट कालव्यात मिसळत आहे, त्यामुळे सध्या धरणातून पाणी न सोडताही कालव्यात ठिकठिकाणी काळे, पिवळसर रंगाच्या पाण्याची डबकी साठली आहेत. प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे.
गेल्या काही वर्षांत गाळ काढला नसल्याने कालव्याची पाणी वाहण्याची क्षमता कमी झाली आहे. कालव्यात साठलेला राडारोडा, गाळ, कचरा, दलदल तसेच तीरावरील गवत, झुडपे काढून कालवा स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यामुळे कालव्याची गळती कमी होणार आहे. पाण्याची बचत होऊन पाणी वाहण्याची क्षमता वाढणार आहे.किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग