खडकवासला: खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोटक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणांतील पाणीसाठ्यातील वाढ मंदावली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणसाखळीत १६.५२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५६.६९ टक्के पाणीसाठा झाला होता. विशेष म्हणजे, पानशेत-वरसगाव परिसरात तब्बल १० दिवसांनंतर प्रथमच सूर्यदर्शन झाले.
चार दिवसांच्या अतिवृष्टीनंतर पावसाचा जोर ओसरला असला, तरी नद्या, ओढे आणि नाल्यांमधून अजूनही पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे. गेल्या २४ तासांत धरणसाखळीत ०.३२ टीएमसी पाण्याची भर पडली. धरणसाखळीत गुरुवारी (दि. ९) सायंकाळी १६.१७ टीएमसी पाणीसाठा होता. खडकवासला धरणातून पाणी सोडले जात असले, तरी धरण पुन्हा १०० टक्के भरले आहे.
मध्यम पाणीसाठ्याकडे धरणसाखळी
गेल्या १ जुलैपासून धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर ५ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. ३० जून रोजी केवळ ३.६३ टीएमसी इतका अल्प पाणीसाठा असलेली धरणसाखळी आता १६.५२ टीएमसीपर्यंत पोहोचली आहे. १ जून ते १० जुलैदरम्यान टेमघर धरणक्षेत्रात सर्वाधिक १,२२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, पानशेत येथे ९८५, वरसगाव येथे ९५५ आणि खडकवासला धरण क्षेत्रात ४१९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.