खडकवासला: पानशेत-मुठा-मोसे खोऱ्यासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर रविवारी दुपारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक शनिवारपेक्षा (दि. २५) कमी झाली. रविवारी सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरणसाखळीत २५.५४ टीएमसी म्हणजेच ८७.६३ टक्के पाणीसाठा झाला होता. दरम्यान, पाण्याची आवक मंदावल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत केला जाणारा विसर्ग रात्री ११ वाजता पूर्णपणे थांबविण्यात आला.
मागील पाच दिवस पडलेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत धरणसाखळीत जवळपास एक टीएमसीची भर पडली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत २४.५६ टीएमसी साठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीत ०.७० टीएमसी अधिक साठा आहे. गेल्या वर्षी २६ जुलै २०२५ रोजी धरणसाखळीत २४.८४ टीएमसी (८५.२० टक्के) पाणी होते. रविवारी दिवसभरात टेमघर येथे ३६ ,पानशेत येथे ९, वरसगाव येथे ५ आणि खडकवासला येथे ५ मिलिमीटर पाऊस पडला.
वरसगाव धरणाच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण-मारके म्हणाल्या की, गेले पाच दिवस पडलेला जोरदार पाऊस आणि सध्याच्या रिमझिमीमुळे ओढे-नद्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. जोरदार पाऊस नसल्याने पाण्याची आवक मंदावली आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग दुपारनंतर टप्प्या टप्प्याने कमी करून रात्री पूर्णपणे थांबविण्यात आला. असे असले तरी खडकवासला शंभर टक्के भरले असल्याने धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास जादा पाणी मुठा नदीत सोडले जाणार आहे. खबरदारीसाठी खडकवासला जलसंपदा विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
घाटमाथ्यासह चारही धरणक्षेत्रांत पावसाचा जोर ओसरला आहे. रिमझिम पावसासह अधूनमधून सरी कोसळत आहेत. पावसाचे ढग विरळ होऊन थोडावेळ सूर्यदर्शन होत आहे. त्यामुळे धरण खोऱ्यात शेतीची खोळंबलेली कामे सुरू झाली आहेत.