खडकवासला: गेल्या पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पानशेत खोऱ्यात बुधवारी (दि.१५) पावसाची रिमझिम सुरू झाली होती. गुरुवारी (दि.१६) पानशेत-मुठा खोऱ्यात तुरळक पाऊस पडला. शनिवारपासून (दि.११) खडकवासाला धरण साखळीतील पाणीसाठा स्थिर आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत ५७.८६ टक्के साठा झाला होता.
दिवसभरात पानशेत येथे १४, टेमघर येथे ६ आणि वरसगाव येथे ९ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरण परिसरात मात्र कडकडीत ऊन पडले होते.
वरसगाव धरण जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण-मारके म्हणाल्या, की धरणसाखळीत नद्या, ओढे-नाल्यांतून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. खडकवासला वगळता इतर तिन्ही धरणक्षेत्रांत पावसाळी वातावरण आहे. मात्र, अपेक्षित पाऊस पडत नाही.