खडकवासला: घाटमाथ्यासह मोसे-मुठा खोऱ्यात रविवारी (दि. २) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे शंभर टक्के भरलेल्या पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणांतून विसर्ग सुरूच आहे. खडकवासलातून मुठा नदीत सायंकाळी सहा वाजता ९,४१६ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. पावसाचे प्रमाण वाढल्यास पुन्हा जादा पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला धरणसाखळी जवळपास शंभर टक्के भरली आहे. धरणसाखळीत रविवारी सायंकाळी पाच वाजता २८.९० टीएमसी म्हणजे ९९.१५ टक्के साठा झाला होता. टेमघर धरणही लवकरच शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत. धरणात ९३.२८ टक्के साठा झाला आहे. शनिवारी (दि. १) पावसाचा जोर ओसरला होता.
मात्र, रात्रीपासून घाटमाथ्यासह पानशेत खोऱ्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला. पाण्याची आवक वाढल्याने खडकवासलाच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजता मुठा नदीत तब्बल २४ हजार २७७ क्युसेकने पाणी सोडले जात होते.
मात्र, रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग पुन्हा कमी करण्यात आला. रविवारी दिवसभरात टेमघर येथे २२, वरसगाव येथे १४, पानशेत येथे १८ व खडकवासला येथे २ मिलिमीटर पाऊस पडला. हलक्या सरी सुरू असल्याने मोसे, मुठा, आंबी नद्यांसह ओढे-नाले भरून वाहत आहेत.
गेल्या वर्षापेक्षा जास्त जलसाठा
पानशेतमधून ७,०४२ आणि वरसगावमधून ७,७९२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. गतवर्षी २ ऑगस्ट रोजी धरणसाखळीत २५.६४ टीएमसी म्हणजे ८७.९७ टक्के साठा होता. यंदा धरणसाखळी जवळजवळ शंभर टक्के भरली आहे.