पुणे: शहरात गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी (दि. 2 एप्रिल) शहरालगत असलेल्या खडकवासला धरण क्षेत्रातही विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या असून, अडीच तासांत 105 मिलिमीटर पावसाची नोंद केली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.
शहर आणि परिसरासह जिल्ह्याच्या काही तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. सकाळी कडक ऊन आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रातही पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, लगत असलेल्या पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात तुरळक पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी खडकवासला धरणात झालेल्या पावसामुळे किंचित वाढ झाली आहे. चारही धरणांत मिळून 13.89 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 47.65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एक टीएमसी जादा पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने नमूद केले.
तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना
पुणे शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त आहे. पुणे शहरात बुधवारी 10.1 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. ग्रामीण भागात सर्वाधिक 9.1 मिलिमीटर पाऊस झाला असून, त्यापाठोपाठ हवेली तालुक्यात 8.5 मिलिमीटर आणि पुरंदर-सासवड भागात 3.5 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, जिल्ह्याच्या एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत 2.5 मिलिमीटर आहे. भोर, मावळ, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव तालुक्यामध्ये तुरळक पाऊस झाला. इतर तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसामुळे शेतपिकाला मोठा फटका बसला असून, महसूल विभागस्तरावर तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात अनेक ठिकाणी 4 एप्रिलपर्यंत मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात, पशुधनाची सुरक्षित व्यवस्था करावी.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी