Ketan Murder Case: पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल हत्याप्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिस तपासानुसार, केतनशी साखरपुडा होण्यापूर्वी आरोपी सिया गोयल ही तिचा कथित प्रियकर चेतन चौधरीसोबत उदयपूरला फिरायला गेली होती. या प्रवासाशी संबंधित पुरावे आणि इतर माहिती पोलिस तपासत असून, संपूर्ण कट उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. त्या दोघांचे साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या नात्यामागे वेगळाच कट रचला गेला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी हे काही मित्रांसोबत साखरपुड्याच्या काही आठवडे आधी उदयपूरला गेले होते. तेथे त्यांनी काही दिवस मुक्काम केला होता. पोलिस आता या दौऱ्याशी संबंधित प्रवासाची नोंद, डिजिटल पुरावे आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करत आहेत.
पोलिसांच्या चौकशीत सियाने केतनशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, लग्न मोडल्यास बदनामी होईल, अशी भीती सिया आणि चेतनला होती. त्यामुळे केतनचा काटा काढल्यास काही वर्षांनी दोघांना लग्न करता येईल, असा कथित कट रचल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
तपासात आणखी एक महत्त्वाचा दावा समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सियाने शॉपिंगच्या कारणावरून केतन अग्रवालकडून सुमारे 1 कोटी रुपये घेतले होते. हे पैसे तिने चेतन चौधरीला दिल्याचा संशय आहे. या पैशांच्या मदतीने चेतनला स्वतःचा व्यवसाय आणि करिअर उभे करायचे होते, असा पोलिसांचा दावा आहे.
तपासानुसार, आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी चेतनला किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे त्याने सियाला सांगितले होते. त्यानंतर योग्य वेळ साधून दोघांनी लग्न करण्याचा कथित बेत आखल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून रविवारी (28 जून) पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी सिया गोयलला लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळी क्राइम सीन रिक्रिएट (Crime Scene Recreation) केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 18 जून रोजी नेमका घटनाक्रम कसा घडला, हे समजून घेण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवालला किल्ल्यावरील खोल दरीत ढकलून त्याची हत्या केली.
या प्रकरणात पोलिस तपास अद्याप सुरू असून, समोर येणारी माहिती ही तपासाचा भाग आहे. आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी असून, या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.