काटेवाडी: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहूहून प्रस्थान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना बारामती तालुक्यातील लिमटेक-काटेवाडी-भवानीनगर-शेरपूल या पालखी मार्गावरील अपूर्ण आणि रखडलेल्या कामांमुळे वारकरी, भाविक तसेच वाहनचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतलेल्या या मार्गावरील अनेक कामे अद्याप पूर्ण न झाल्याने यंदाच्या पालखी सोहळ्यात वैष्णवांची वाट अधिक खडतर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मागील महिन्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाची पाहणी करून अपूर्ण कामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. पालखी सोहळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामांचा वेग अत्यंत संथ असून, काही कामे अर्धवट अवस्थेतच पडून आहेत. त्यामुळे ठेकेदारांच्या दिरंगाईबाबत स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लिमटेक ते इंदापूर महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील काही भागातील कामे पूर्ण झाली असली तरी मासाळवाडी ते शेरपूल परिसरातील कामे अद्याप अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी कच्च्या मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने धूळ उडत आहे. पावसाळ्यात याच ठिकाणी चिखल आणि पाण्याची डबकी साचण्याची शक्यता असून, वारकऱ्यांना पायी चालणेही कठीण होणार आहे.
रस्त्यावरील खड्डे आणि उचकटलेली खडी यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. सेवा रस्त्यांलगत गटार बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळया अनेक ठिकाणी हातभर बाहेर आल्या आहेत. तसेच, मोठमोठ्या काँक्रीट प्लेट्स रस्त्याच्या कडेला पडून आहेत. या साहित्यामधून बाहेर आलेल्या लोखंडी सळयांमुळे गर्दीच्या काळात वारकऱ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
पालखी सोहळा भवानीनगर येथे इंदापूर तालुक्यात प्रवेश करत असताना शेरपूल येथील उड्डाणपूल हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतो. मात्र, हा उड्डाणपूल अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, पुलावरील रस्ता खाचखळग्यांनी भरलेला आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे काम बाकी असल्याने पालखी आगमनापूर्वी हा मार्ग तातडीने दुरुस्त करून सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आदेशांना हरताळ?
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः पाहणी करून कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी कामांचा वेग वाढलेला दिसत नसल्याने संबंधित ठेकेदार आणि यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अपूर्ण कामे मार्गी लावावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.