Kamgar Din Special Pudhari
पुणे

Kamgar Din Special: घामानं भिजलेलं आयुष्; कुटुंबासाठी झगडणाऱ्या हातांची न बोललेली वेदना

कामगार दिनानिमित्त डिलिव्हरी बॉय आणि सुरक्षारक्षकांची संघर्षमय कहाणी

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे: ‌‘पप्पा आता या जगात नाहीत. त्यामुळं घराची जबाबदारी माझ्यावर आहे. नोकरीसाठी खूप फिरल्यानंतर अखेर नोकरी मिळाली ती एका कंपनीसाठी पार्सल जमा करण्यासाठीची. आता दिवसाची सुरुवात होते ती पार्सल उचलण्यानं आणि शेवट होतो तो थकलेल्या शरीरानं.

पण, कोणाला सांगणार? जिद्द घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागतो. महिन्याला 13 ते 15 हजार रुपये मिळतात. यात चार जणांचं कुटुंब सांभाळावं लागतं. तरीही मनात एकच विचार असतो, आज कठीण दिवस आहेत; पण उद्याचा दिवस नक्की चांगला असेल...‌’ ही कहाणी आहे आनंद विजापुरे यांची.

आनंद यांच्यासारखे कित्येक जण आज भर उन्हात राबताना आपण पाहिलेच असतील. पुण्याच्या रस्त्यांवर रोज दिसणारे डिलिव्हरी बॉय आणि सोसायट्यांच्या गेटवर उभे असलेले सुरक्षारक्षक ः आपण त्यांना पाहतो. पण, त्यांच्या आयुष्याचा संघर्ष मात्र अनेकदा नजरेआड असतो.

तुटपुंजा पगार, दिवसभराची भर उन्हात फिरस्ती अन्‌‍ लोकांकडून न मिळणारी योग्य वागणूक, असे सारेकाही त्यांना सहन करावे लागतेय. पण, कुटुंबाच्या जबाबदारीपुढे ते सगळे सहन करतात. शुक्रवारी (दि. 1 मे) साजऱ्या होणाऱ्या कामगार दिनानिमित्त दै. ‌‘पुढारी‌’ने साधलेल्या संवादात त्यांच्या जगण्याचा हा वेदनादायी; पण प्रेरणादायी पट उलगडला अन्‌‍ आपलीच कहाणी सांगताना प्रत्येकाचे डोळेही पाणावले.

आयुष्याला आधार देण्यासाठी राबणाऱ्या या हातांना आस आहे ती चांगल्या पगाराची आणि नोकरीच्या ठिकाणी चांगल्या वागणुकीची. आम्हीही कष्ट करतो, त्यामुळे आमच्या कामालाही आदर द्या, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रत्येकाने आपल्या अडचणी मांडल्याच; पण त्याचबरोबर एक समाधानही व्यक्त केले, ‌‘कष्ट करून कुटुंब चालतंय, एवढंच पुरेसं आहे.‌’

उमेश शेट्टी यांचाही दिवस असाच धावपळीत जातो. 10 ते 20 मिनिटांत ग््रााहकांपर्यंत किराणा, फळे, भाज्या आणि इतर वस्तू पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. एका ऑर्डरमागे फक्त 30 रुपये मिळतात.

दिवसभराच्या मेहनतीनंतर महिन्याला साधारण 20 हजार रुपये हातात पडतात. ‌‘ऊन असो वा पाऊस, काम करावंच लागतं,‌’ असे उमेश सांगतात. मात्र, ‌’या सगळ्यात आम्ही खूप मेहनत घेऊन पार्सल वेळेवर पोहचवतो. आम्हालाही नीट वागणूक मिळालीच पाहिजे,‌’ असेही ते नमूद करतात. सोसायट्यांच्या गेटवर उभे असलेले सुरक्षारक्षकही तितक्याच संघर्षातून जात आहेत.

सुभाष ताडे यांनी निवृत्तीनंतरही काम करण्याचे ठरविले. म्हणून पुन्हा सुरक्षारक्षक म्हणून ते कामाला लागले. का? तर हातात चार पैसे असावेत म्हणून. सुरक्षारक्षक म्हणून काम करणे सोपे नाही. ‌‘संपूर्ण सोसायटीची जबाबदारी आमच्या खांद्यावर असते. 10 ते 12 तासांची ड्युटी, अपुरी झोप आणि पगार मात्र फक्त 12 ते 15 हजार रुपये.

काही झालं तर जाब आम्हालाच विचारला जातो,‌’ ही वेदना त्यांनी मांडली. ‌‘पण, या कामातून आनंद मिळतो,‌’ हेही सांगायला ते विसरले नाहीत. शशिकांत वाघमारे यांची खंत तर मनाला भिडणारी आहे. आम्हीही दिवसभर उभं राहून काम करतो. मग आमच्या कामाला दुय्यम स्थान का?‌’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पत्नी आणि दोन मुलींच्या जबाबदाऱ्या पेलताना मी दिवस-रात्र मेहनत घेत आहे. पण, समाजात अजूनही आमच्या कामाला कमी लेखले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT