ओतूर: कमी बाजारभावामुळे गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नरच्या दुय्यम बाजार आवार ओतूर येथे गुरुवारी (दि. ९) झालेल्या कांदा लिलावात पूर्वीच्या तुलनेत बाजारभावात चांगली वाढ झाल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले.
गुरुवारी पार पडलेल्या लिलावात गोळा कांद्याला प्रति १० किलो २६० ते ३०१ रुपये, सुपर कांद्याला २०० ते २७० रुपये, गोल्टी/गोल्टा कांद्याला १०० ते २१० रुपये, तर बदला कांद्याला ५० ते १५० रुपये असा बाजारभाव मिळाला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत पूर्वी मिळत असलेल्या कमी भावाच्या तुलनेत ही वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.
बाजारभाव व आवक याबाबतची माहिती ओतूर उपबाजार कार्यालयीन व्यवस्थापक दीपक मस्करे यांनी दिली. त्यानुसार, गुरुवारी ओतूर उपबाजारात कांद्याची १४ हजार ३२० पिशव्यांची आवक झाली. बटाट्याची १३ पिशव्यांची आवक नोंदविण्यात आली. बटाट्याला प्रति १० किलोला ५० ते १२० रुपये असा बाजारभाव मिळाला.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय शिवाजीराव काळे, उपसभापती निवृत्ती मुरलीधर काळे, सचिव रुपेश सुभाषराव कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने लिलावाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. आगामी काळातही भावात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ओतूर येथे दर गुरुवार आणि रविवारी सकाळी १० वाजल्यापासून कांद्याचे लिलाव होतात.