नारायणगाव : जुन्नर तालुक्यात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, शेतकरी शेतात काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, बाजारात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कांद्याचे बाजार भाव एकीकडे पडले, तर कांदा काढण्यासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर मात्र आकाशाला भिडले आहेत. एका जोडीला हजार रुपये मोजावे लागत आहेत. सध्या बनकर फाटा या ठिकाणी कांदा काढण्यासाठी मजुरांची अगदी पळवापळवी देखील पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, बेल्हे, पिंपळवंडी, खोडद या भागांत मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली होती. हवामान अनुकूल राहिल्याने उत्पादन चांगले झाले आहे. मात्र, सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल सुमारे 800 ते 1200 रुपये दर मिळत असल्याने उत्पादन खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे, असे शेतकरी सांगतात.
कांदा काढणीसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. सध्या तालुक्यात मजुरांना दररोज सुमारे 400 ते 500 रुपये मजुरी द्यावी लागत असल्याचे शेतकरी सांगतात. काही ठिकाणी कामाच्या प्रमाणानुसार पोते भरणे किंवा कांदा गोळा करण्याच्या हिशेबानेही मजुरी दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे.
“कांद्याचे उत्पादन चांगले आले आहे, पण बाजारभाव खूपच कमी आहेत. खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढला आहे. या दरात कांदा विकल्यास खर्चही निघणे कठीण आहे,” असे नारायणगाव परिसरातील शेतकरी सुनील गावडे यांनी सांगितले.ओतूर येथील शेतकरी स्वप्नील अहिनवे म्हणाले, “कांदा काढणीसाठी मजुरांना जास्त मजुरी द्यावी लागते. त्यात वाहतूक खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.”
कांदा काढणीचे काम कष्टाचे असल्याने मजुरी योग्य असल्याचे मजूर सांगतात. “दिवसभर उन्हात काम करावे लागते. त्यामुळे मजुरी थोडी वाढली असली तरी ती कष्टाच्या मानानेच आहे,” असे बनकर फाटा परिसरातील मजूर रामभाऊ भोसले यांनी सांगितले.
सध्या शेतकरी कांदा काढून साठवणुकीकडे वळत असून, पुढील काही दिवसांत बाजारभाव वाढतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, दरात सुधारणा झाली नाही तर शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी चिंता व्यक्त होत आहे.