जेजुरी: अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील युद्धामुळे देशात सर्वत्र गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा विपरीत परिणाम कारखानदारीवर झाला आहे. आखाती देशात होणारी निर्यात व कच्च्या मालाची आयात ठप्प झाल्याने जुजेरी औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना मोठा फटका बसला आहे.
जेजुरी औद्योगिक वसाहतीत सुमारे दोनशे कारखाने आहेत. यात लघुउद्योगांचे प्रमाण अधिक आहे. सुमारे आठ हजार कामगार येथे नोकरीस आहेत. या वसाहतीत फॅबिकेशन व इंजिनिअरिंग उद्योगांचे प्रमाण सत्तर टक्के आहे. या उद्योगांना मोठ्या प्रमाणात गॅसची गरज असते. आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुरवठा बंद झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. एलपीजी गॅसऐवजी ऑक्सिजन गॅसचा पर्याय वापरला जात आहे. गॅस तुटवड्यामुळे काही उद्योग बंद होण्याची चिन्हे आहेत. यामुळे कामगारकपातीचे संकट उभे ठाकले आहे.
औद्योगिक वसाहतीतील मोठ्या कारखान्यात कामगारांसाठी कॅन्टीनची व्यवस्था आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे कॅन्टीन व्यवस्था कोलमडली आहे. बाहेरून आलेल्या कामगारांच्या जेवणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही दिवसांत पुरेसे गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्यास कॅन्टीन बंद पडून कामगारांचे हाल होणार असल्याचे कॅन्टीनमालकांनी सांगितले.
जेजुरी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून तयार होणारे उत्पादन आखाती देशात पाठविले जाते. अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. मालाचे कंटेनर बंदरात अडकले आहेत. आखाती युध्दामुळे पेट्रोकेमिकलच्या आयातीवर देखील परिणाम झाला आहे.
आयात होत नसल्याने उद्योजकांना जादा पैसे देऊन कच्चा माल आणावा लागत आहे. उत्पादन करणे जिकिरीचे झाले आहे, असे जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांनी सांगितले. आखाती युद्ध न थांबल्यास जेजुरी औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामगारांबरोबरच उद्योजक देखील अडचणीत येणार आहेत.